सारसबाग बंद ठेवून मुस्लिम धर्मियांना रोखले   

महापालिकेचा धक्कादायक निर्णय

पुणे : महापालिकेने बासी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबाग बंद ठेवून शेकडो मुस्लिम धर्मियांच्या आनंदावर विरजण घातले. सारसबागेत मुस्लिम धर्मियांना रोखण्याच्या या धक्कादायक निर्णयावरून महापालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सारसबाग बंद ठेवून महापालिकेने त्यांच्या मुलभूत नागरी हक्कांवरच घाला घातला, असे परखड मत व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी संघटनाकंडून चीड व्यक्त करण्यात आली. 
 
भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सारसबागेत बासी ईद साजरी करण्याची प्रथा अनिष्ट असल्याची भूमिका घेत त्याविरोधात हिंदू संघटनांनी तक्रारी केल्या असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. ईदच्या दुसर्‍या दिवशी बासी ईद असते. या दिवशी सारसबाग बंद ठेवावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. त्यामुळे रविवारी सारसबाग बंद ठेवण्यात आली. वर्षानुवर्षे बासी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम धर्मिय नागरिक सहपरिवार सारसबागेत येतात. त्यांना पालिकेच्या निर्णयाचा फटका बसला. मुलाबाळांसह सारसबागेत आलेल्या नागरिकांना घरी परत जावे लागले. यावर सामाजिक विचारवंत अन्वर शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या पक्षपाती भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सारसबाग बंद ठेवून मुस्लिम धर्मियांना रोखले

जर मुस्लिम धर्मियांकडून पालिकेला कर भरला जातो, तर त्यांना सार्वजनिक बागा, उद्याने वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक खासदाराच्या सूचनेवरून सार्वजनिक बाग बंद करणे, ही लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात जाणारी कृती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.ईदच्या दुसर्‍या दिवशी अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांसह फिरण्यासाठी सारसबाग आणि इतर बागांमध्ये जातात. ही अलीकडची प्रथा नसून वर्षानुवर्षे तो परिपाठ राहिला आहे. या दिवसाचे महत्त्व सामाजिक सलोखा, कौटुंबिक आनंद आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करणारे असते. मात्र, यावर्षी विशेष कारण न देता फक्त एका लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून सारसबाग बंद ठेवण्यात आली, यामुळे सुजाण नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 
 
महापालिकेने सारसबाग बंद ठेवण्यामागील कारण स्पष्ट करावे, भविष्यात कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावणारे निर्णय टाळावेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी आणि लोकप्रतिनिधीच्या दबावात येऊन सार्वजनिक सुविधा बंद करू नयेत, अशा मागण्या शेख यांनी महापालिका आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने या धक्कादायक निर्णयावरून टोलवाटोलवी सुरु केली असून स्थानिक पोलिस अधिकारी आणि उद्यान अधिक्षकांच्या बैठकीत सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय झाला, असे पालिकेने म्हटले आहे. 
 

Related Articles